अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिभेला बहर आला असून सर्वच राजकीय पक्षांची खिल्ली उडवली जात आहे. स्वत:ला स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपवरही लोक तुटून पडले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’चे अग्रलेख यात भर घालत आहेत.भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईच्या दाव्याचा ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांसह सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. केंद्रातील भाजप सरकारकडून कालपर्यंत त्यांच्या चौकशा केल्या जात होत्या. केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत होत्या. तेच लोक आता भाजपच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. याचा संदर्भ देत ‘सामना’नं भाजपवर हल्लाबोल केला आहे.
‘महाराष्ट्रात भाजपनं केलेल्या राजकारणामुळं संपूर्ण देशात त्यांची छी:थू होत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या हेच भाजप प्रवेश घ्यायचे राहिले आहेत. त्यातील एकास पक्षाचा राष्ट्रीय खजिनदार, दुसऱ्यास नीती आयोग व तिसऱ्याला देशाच्या रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नेमला जाईल. कारण भ्रष्टाचार, लुटमार, नैतिकता हा आता भाजपसाठी मुद्दा राहिलेला नाही, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय.
‘सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार हे चक्की पिसायला तुरुंगात जातील असं देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते, पण त्याच अजित पवारांनी फडणवीस यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व सोमवारी हे ‘चक्की पिसिंग’ फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर त्यांच्या गटाचं खातेवाटप करीत बसले, याकडं ‘सामना’नं लक्ष वेधलं आहे.
आता देवेंद्र फडणवीस काय करणार?
‘अजित पवार यांच्या सरकार प्रवेशामुळं शिंदे गटाबरोबरच फडणवीस यांचीही गोची झाल्याचं ‘सामना’नं म्हटलं आहे. ‘अजित पवार, हसन मुश्रीफ, भुजबळ, प्रफुल पटेल यांनीच त्यांच्या तंबूत सन्मानानं प्रवेश केल्यानं ते आता चक्की पिसायला कोणास पाठवणार आहेत? मुलुंडचे पोपटलाल, अंजलीबाई दमानिया यांनी तरी काय करायचं? भुजबळांविरुद्ध काय कमी मोहीम उघडली होती? सिंचन घोटाळ्याचेच गाडीभर पुरावे घेऊन फडणवीस बैलगाडीवर स्वार झाले होते. तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूची कोठडी त्यांनी या सगळ्यांसाठी राखूनच ठेवली होती. आता फडणवीस काय करणार?, असा रोकडा सवाल ‘सामना’नं केला आहे.