• Sat. Jun 28th, 2025

बुलढाणा बस अपघात नेमका कशामुळं झाला?; फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती

Byjantaadmin

Jul 5, 2023

विकासाचा मार्ग असे म्हणून नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटन झाल्यापासून अनेक अपघात या महामार्गावर अपघात झाले आहे. गेल्या शनिवारी या महामार्गावरचा सर्वात भीषण अपघात झाला. यात तब्बल २५ जण होरपळून ठार झाले. गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर नोंदवल्या गेले आहेत. शनिवारी विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला झालेल्या अपघाताच्या घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला असून यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने या भीषण अपघाताची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल आला असून अनेक धक्कादायक बाबी यात उघड झाल्या आहेत. हा अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती. ही लेन वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी आहे.

या लेनमध्ये असतांना बसचा वेग हा जास्त होता. चालकाला डुलकी लागल्याने आधी बसचे समोरचे चाक हे महामार्गाच्या साईन बोर्डला धडकले. यानंतर बस पलटी होऊन ती दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. या घटनेत बसचा मागील टायर फुटला तसेच बसचा एक्सेल तुटून तो वेगळा झाल्याने डिझेल टँकवर आदळला डिझेल टँकमधील तब्बल ३६० लिटर डिझेल सर्वत्र सांडले. हे तेल इंजिनच्या गरम भागाच्या संपर्कात आल्याने पेटले. यामुळे अल्पवधीत बसने देखील पेट घेतला आणि तब्बल २५ प्रवाशांचा होपळून मृत्यू झाला.

दरम्यान, तपासात या बसने अनेक वाहतुकीचे नियम मोडल्याचे देखील तपासात आढळले. या बसची पियूसी देखील संपली होती. त्यामुळे बसला २०२१मध्ये १२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच बसचे फिटनेस प्रमाणपत्र देखील नव्हते. अयोग्य लाईटचा वापर केल्याने तब्बल ४ हजार ५०० रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. दरम्यान, फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याने २३ हजार ५०० रूपए दंड ठोठावण्यात आला होता. या बसवर तीन वर्षात ४५ हजारांहून अधिकची चलनं फाडण्यात आली आहेत. जो दंड तीन वर्षात भरला नाही तो दंड बसचे जळून सांगाडे झाल्यावर भरण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *