विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपकडून (BJP) तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं (AAP) केला आहे.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. त्यांनी काही आमदारांसह भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा पुरावा असल्याची भूमिका आपने मांडली. राजकीय घडामोडीवर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय स्थितीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी भूमिका मांडली.
महाराष्ट्रात जे काही घडले त्यावरुन सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सीचा कसा वापर केला जातो हे दिसून येत असल्याचे सिंह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही संजय सिंह यानी टीका केली. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचार्यांवर कारवाई करत नाहीत, तर ते भ्रष्टाचाराला पोसणारे सर्वात मोठे नेते असल्याचे सिंह म्हणाले. महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. अशा परिस्थितीत त्यांनी नैतिकता आणि प्रामाणिकपणाबद्दल बोलू नये असेही सिंह म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सर्व भ्रष्टांना पदे दिली जातायेत
यावेळी सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची आठवण करुन दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याची हमी देतो. परंतू भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सर्व भ्रष्टांना पदे दिली जात आहेत. काही जणांना उपमुख्यमंत्री केलं जातं आहे, तर काही जणांना विधानसभा निवडणुकीचे प्रभारी बनवले जात असल्याचे सिंहे म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा अजित पवारांनी निर्णय घेतला. यामध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर अन्य आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान देत अजित पवार यांनी बंड केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा तिसरा भूकंप आहे असं बोललं जातं आहे. कारण 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे या दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.