राज्यात दोन दिवसांपूर्वी पुन्हा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठी गट रविवारी (ता. २ जुलै) राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर शिवसेनेत नाराजी असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. या नाराजीच्या चर्चांवर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. “जे घडणार होतं ते आम्हाला माहिती नव्हतं असं नाही, जे घडलं त्याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. अजित दादा जास्त काळ टिकणार नाही आणि ते येणारही नाहीत. पण काहींना तो राजकीय स्टटं वाटत होता. पण असंतोष वाढत असल्याची जाणीवही सर्वांना होती. आम्हाला बहुमताची गरज नव्हती, तरीही त्यांना का घेतलं. हाच प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडला आहे. सगळे १७२ पर्यंत गेले असताना यांना घ्यायची गरज काय,असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी त्यामागचं समीकरण सांगितलं आहे.
“राजकारणात काही समीकरण बसवताना, म्हणजे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका, ही प्रत्येक माणसाची एक ताकद असते, पक्ष तर असतोच पण प्रत्येकाची एक व्यक्तीचीही एक ताकद असते.जे मंत्रिमंडळ झालं ते पाहून आमचेच कार्यकर्ते, अनेक प्रश्न विचारत आहेत. आता तुम्हाला काय मिळणार, याला त्याला काय मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत.या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग झालं आहे. येत्या रविवार पर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही होईल, आमच्या प्रमाणेच भाजपच्या आमदारांची प्रश्न आहे. पण कोणाला काय मिळणार या सर्व गोष्टींचा उलगडा येत्या रविवार पर्यंत होईल, एकदम सर्व सोडून दिलं तर सत्ता काय कामाची, मग सत्तेत का राहायचं, असं होत नाही, म्हणून त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे.