• Sun. Jun 29th, 2025

आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन; असला प्रकार माझ्यासाठी नवा नाही, शरद पवार आक्रमक

Byjantaadmin

Jul 2, 2023

पुणे: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या हा पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या सर्वघडामोडीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच, हे इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान म्हणाले होते राष्ट्रवादी भ्रष्ट्राचारात बुडालेला पक्ष आहे. यावेळी त्यांनी इरिगेशन घोटाळ्याचा आणि शिखर बँकेचा उल्लेख केला. आणि आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले, त्यातून त्यांना मुक्त केले. मी मोदींचे आभार मानतो.प्रश्न आता दुसरा… आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे, त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या सहा तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही प्रश्न उपस्थित गेले होते. संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने विचार करत होतो. पण प्रश्न उपस्थित केले गेले होते, त्यापूर्वीच पक्षापासून काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. आणि आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका घेतली.माझं स्पष्ट मत आहे, आमदारांनी आणि नेत्यांनी घेतलेली भूमिकेसंदर्भात आणखी २ ते ३ दिवसांनी क्लिअर चित्र होईल. त्याचं कारण की ज्यांची नावं आली, त्यातल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क करुन आम्हाला निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, असं सांगितलंय. पण आमची भूमिका वेगळी आहे. ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. याबाबतीत मी आत्ताच काही बोलणार नाही. पण त्यांनी माझ्याइतकंच जनतेच्या समोर त्यांची भूमिका मांडावी. त्यांनी मांडली नाही तर वेगळी भूमिका घेतली, असं समजेन. मांडली तर माझा त्यांच्यावर विश्वास बसेन.

आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याबाबतचा- असा प्रकार इतरांना नवीन असेल, मला तो नवीन नाही. १९८६ साली निवडणुकीच्या नंतर मी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ पैकी ६ सोडले तर सगळे पक्ष सोडून गेले होते. मी त्या ५८ चा विरोधी पक्षनेता होतो. पक्षाची मोट बांधण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो. पक्षाची बांधणी करण्याचं ठरवलं. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा हीच संख्या ६९ वर गेली.

माझा महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. संयुक्त सरकार आम्ही स्थापन केलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येतायेत. आजच्या स्थितीत सगळे सांगतायेत आमची तुम्हाला साथ आहे. ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा फोन आला. अनेक नेते आणि अनेक पक्षांनी मिळून पर्यायी नेतृत्व उभं करावं. सगळ्यांची हीच भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडलाय त्याची मला चिंता नाही. अर्थात उद्या सकाळी मी बाहेर पडेन. कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि उद्या दलित समाजाचा एक मेळावा आहे, त्याला मी उपस्थिती लावेन. आणि त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जातं येईल, जेवढं फिरता येईल, जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल, हाच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. हीच माझी निती.

शिंदेंप्रमाणे अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला तर..

अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, माझं काहीही म्हणणं नाही. कुणी कुणावरही दावा सांगू द्यात. माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आम्हा लोकांच्या मतभेदातून, काही निर्णयातून झाली. पक्ष नसताना पक्ष आम्ही स्थापन केला. त्यामुळे कुणी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही लोकांच्यात जाऊन भूमिका मांडू. त्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा कसा मिळेल, याची काळजी घेऊ…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *