• Sun. Jun 29th, 2025

हे किळसवाणं राजकारण जनता बंद पाडणार का?; राज ठाकरे संतापले!

Byjantaadmin

Jul 2, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी व विरोधी घोटातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत संपूर्ण घडामोडीवर कडवट प्रतिक्रिया दिली आहे.राज ठाकरे यांनी आजच्या घडामोडींबाबत सविस्तर ट्वीट केलं आहे. ‘आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला, अशी टिप्पणी त्यांनी सुरुवातीला केली आहे.

‘उद्धव ठाकरे यांचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेनं रवाना झाली आहे, यथावकाश दुसरी टीम सुद्धा सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असा दावा त्यांनी केला आहे.राज ठाकरे यांनी आजच्या घडामोडींचं विश्लेषण करताना शिंदे गट आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं आहे. ‘तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला, असं त्यांनी म्हटलंय.’महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे हे आज राज्याचं चित्र देशासमोर उभं राहतंय. ज्या राज्यानं देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढं अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

हे किळसवाणं राजकारण जनता बंद पाडणार का?

‘बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री राजकारण्यांना झाल्यासारखं दिसत आहे. त्यामुळं ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?, असा प्रश्नही त्यांनी ट्वीटच्या शेवटी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *