बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहेत. त्यामुळे तो शापित महामार्ग आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. ते शनिवारी (१ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही.”