बुलढाणा : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आठ प्रवासी बचावल्याचं समोर आलं आहे.
हा अपघात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागात झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. यापैकी २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले.दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नशील आहे.दुसरीकडे, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे मोबाईल देखील जळून खाक झाले असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा आप्तांशी संपर्क होणे कठीण होत आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळमधील बहुसंख्य प्रवासी प्रवास करत होते.
अपघात कसा झाला?
अपघातग्रस्त बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा रोडवर आधी बस एका खांबाला धडकली, नंतर ती उजव्या बाजूला असलेल्या संरक्षक दुभाजकावर आपटली आणि पलटी झाली. बस उलटताच डिझेलच्या टाकीने पेट घेतल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली. रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.ही बस एका बाजूला कोसळल्यामुळे दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता. रात्रीच्या वेळी बसमधील प्रवासी गाढ झोपेत असल्यामुळे अपघातानंतर लगेच समजून बाहेर निघेपर्यंत उशीर झाला होता. जवळपास २५ जणांचा जखमी होऊन, किंवा आगीत होरपळून अथवा धुराने गुदमरुन अंत झाला. ज्या प्रवाशांना संधी मिळाली, त्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर उडी घेतली.