यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरा झालं. त्यातच मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मान्सून तळ कोकण आणि गोव्यात दाखल झाल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ आलं. त्यामुळे मान्सूनची गती मंदावली. मात्र आता मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून, मान्सूनने अवघ्या 24 तासांत 400-500 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. मान्सूनचा हा एक नवा रेकॉर्ड असून, मान्सूननं केवळ दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
वेधशाळेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मान्सूननं अवघ्या 24 तासांत 400 ते 500 किलोमीटरचं अतंर पार केलं आहे. देशाच्या जवळपास 90 टक्के भागांत मान्सून पोहोचला असून, दोनच दिवसांत मान्सूननं महाराष्ट्र व्यापला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
पुढील पाच दिवसांचा अंदाज
राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. रविवारी म्हणजेच आज रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.