• Mon. Aug 18th, 2025

विरोधकांची तयारी पाहता भाजपाने बदलली रणनीती; आता एनडीएतील मित्रपक्षांना एकत्र करण्याची तयारी सुरू

Byjantaadmin

Jun 10, 2023

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी देशभरातील विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना भाजपानेही एनडीएची पुनर्रस्थापना करण्याचा विचार केला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने एनडीएमधील मित्रपक्षांना पुन्हा एकदा साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला असून आपल्या भूमिकेत लवचिकता आणली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एनडीएला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या पक्षांसोबत चर्चा सुरू

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा नेतृत्वाने कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष), आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील तेलगु देसम पार्टी (TDP) आणि पंजाबमधील शिरोमणी अकाली दलासोबत आघाडीसंबंधी चर्चा सुरू केली आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील शिवसेना (शिंदे गट) आणि तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षासोबत आघाडीची चर्चा झाली असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील छोट्या छोट्या पक्षांसोबत लवकरच चर्चा केली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली.दिल्लीमध्ये नुकतेच भाजपाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपापल्या राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत संबंध आणखी दृढ करावेत, अशी सूचना केली. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सांगितले की, टीडीपी, शिवसेना (उबाठा), अकाली दल आणि जेडी (यू) हे पक्ष एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजपा प्रादेशिक पक्षविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण होत आहे, त्यामुळे प्रादेशिक पक्ष भाजपापासून दूर लोटले जात आहेत.

अकाली दलासोबत पुन्हा जवळीक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण केल्यानंतर भाजपाने अकाली दलासोबतचे वाद संपुष्टात आणून पुन्हा संवाद प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. congress पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जालंधर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आप पक्षाने ३४.१ टक्के मतदान मिळवत विजय खेचून आणला. तर अकाली दलाला १७.९ टक्के आणि भाजपाला १५.२ टक्के मतदान मिळाले.

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, मागच्या वर्षी पंजाब विधानसभेत पराभव झाल्यानंतर अकाली दल एनडीएमध्ये पुन्हा येण्यास इच्छूक होता. भाजपाने तेव्हा छोट्या पक्षांसह विधानसभा निवडणूक लढली होती. काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या पंजाब लोक काँग्रेस पक्षासोबत भाजपाने युती केली होती. या निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकण्यात यश आले. तर शिरोमणी अकाली दलाला तीन जागांवर विजय मिळाला. त्यामुळे भाजपा आता आपल्या जुन्या मित्रासोबत पुढील निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहे, जेणेकरून दोन्ही पक्षांना त्याचा लाभ मिळेल.

कर्नाटकात जेडीएस बरोबर आगामी काळात युती

कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीएस पक्ष भाजपासोबत युती करण्यास तयार होता. मात्र भाजपाने रणनीतीच्या आधारावर जेडीएसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तथापि, विधानसभेत भाजपाच्या मतदानाच्या टक्केवारीत आश्चर्यकारक घट झाल्यामुळे भाजपा निराश आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि जेडीएसने एकत्र येणे दोन्ही पक्षांसाठी संयुक्तिक ठरू शकते. तसेच काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार जेडीएसच्या पाठिशी उभा राहणार नाही, अशी जेडीएसची अटकळ आहे. त्यामुळे भाजपासोबत युती करण्यास त्यांना अडचण येणार नाही.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातस्थळी ठाण मांडून चांगले काम केले, असे वक्तव्य जेडीएसच्या नेत्यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये जवळीक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर भाजपाला जेडीएसकडे असलेली वोक्कालिगा समाजाची मतपेटी फायद्याची ठरू शकते.

कर्नाटकचा झटका आंध्र प्रदेशातही

कर्नाटकमध्ये झटका बसल्यानंतर भाजपा आंध्र प्रदेशातील टीडीपी पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधत आहे. चंद्राबाबू यांनीदेखील मागच्या काळात भाजपाशी आघाडी करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तेव्हा भाजपाने ताठर भूमिका घेतली होती. मागच्या आठवड्यात चंद्राबाबू नायडू यांनी दिल्ली येथे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री amit shah भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत संवाद साधल्यामुळे आगामी काळात टीडीपी पुन्हा एकदा एनडीएचा घटक होईल, अशी शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी कायम

जून २०२२ मध्ये, शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्रीeknath shinde यांचा गट भाजपासोबत सत्तेत आहे. मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबतची आघाडी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळावेत, यासाठीही वर्षभरापासून आग्रही आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेसाठी आघाडी जाहीर केल्यानंतर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या पारड्यात काही मंत्रिपदे पडू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *