आज
२९ ऑक्टोबर
जागतिक इंटरनेट दिवस
२९ ऑक्टोबर हा ‘जागतिक इंटरनेट दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. भारतात १९९५ च्या सुमारास इंटरनेट उपलब्ध झालं असलं, तरी त्यापूर्वी कित्येक दशके अमेरिकेत आणि काही युरोपियन देशांमध्येही त्यासंबंधीचं संशोधन जोमानं चाललेलं होतं. १९६९ हे वर्ष विज्ञानाच्या दृष्टीनं एकूणच क्रांतिकारी होतं. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल ठेवलं. त्याच वर्षी पुढे सुमारे ३ महिन्यांनी २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाईन पाठवला गेला. म्हणूनच २९ ऑक्टोबर या तारखेला ‘जागतिक इंटरनेट दिवस’ मानलं जाते.
१९६९ च्या २९ ऑक्टोबरला जो प्रसंग घडला, तो मोठा मनोरंजक आहे. १९६० च्या दशकात अमेरिकन सैन्याला इंटरनेटसारखी व्यवस्था गुप्त संदेश वहनासाठी हवी होती. त्यादृष्टीनं अमेरिकन संरक्षण खात्यानं एका संशोधन प्रकल्पाला मोठं अर्थसाह्य देऊन अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्या संशोधनाचे आव्हान सोपवलं होतं. या प्रकल्पांतर्गत एकूण चार संगणक अमेरिकेतील चार विद्यापीठांमध्ये जोडण्यात आलेले होते. खरं तर त्या चार संगणकांचं ते जगातलं पहिलं इंटरनेट होतं. या चार संगणकांपैकी एक होता कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस विद्यापीठात, तर दुसरा होता स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधन विभागात. तिसरा आणि चौथा संगणक कॅलिफोर्निया सांता बार्बरा आणि उता विद्यापीठात बसविलेला होता. १९६९ चे ते संगणक अर्थातच आजच्यासारखे प्रगत नव्हते. मॉनिटर्स तर हिरव्यार्जद अक्षरांनी चमकणारे असत. कॅलिफोर्निया मध्ये चार्ली क्लिने या विद्यार्थी संगणकप्रणाली निर्मात्याने एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवला गेला. पहिल्या वेळी पाठविलेल्या login या शब्दापैकी केवळ lo शब्द पोचल्यानंतर सिस्टिम फेल झाली. पुढील अक्षरे जाऊ शकली नसली, तरी दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासामध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. असा तो २९ ऑक्टोबर १९६९चा प्रसंग. अमेरिकन विद्यापीठं, त्यातील तरुण विद्यार्थी आणि अमेरिकन सैन्य एकमेकांना कशी पूरक ठरत होती, हाही त्यातून आपल्यासाठी निघणारा एक बोध.
अशा प्रकारे ४७ वर्षांपूर्वी दोन तरुणांनी इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला. तेव्हा २१ वर्षांचा असणारा चार्ली क्लाईन आता ६८ वर्षांचा आहे. मोबाईलवर इंटरनेट वापरणार्या आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं चार्ली आणि बिल गेल्या पिढीतले आहेत; पण त्या पिढीनं पुढल्या पिढीसाठी छड यशस्वी केल्यानंतरच हे शब्द आज सहजपणे जगभर फिरताहेत. संगणकांच्या छोट्या छोट्या गटांना जोडत जगभरामध्ये निर्माण झालेल्या जाळ्यालाच वर्ल्डवाईड वेब किंवा इंटरनेट असे म्हणतात. माहिती किंवा ज्ञानाच्या साठ्याला लोकांच्या मोठ्या गटापर्यंत पोचविण्याचे काम या जाळ्यामार्फत होत असते.
आजवर ज्ञान ही केवळ काही लोकांचीच मक्तेदारी असल्याचे मानले जात होते. त्यामध्ये सार्वत्रिक शिक्षणासोबतच इंटरनेटच्या निर्मितीमुळे खऱ्या अर्थाने बदल घडला आहे. त्यामुळे या प्रणालीला खरीखुरी लोकशाही प्रणाली म्हणता येईल. सुरवातीच्या काळात इंटरनेट हे अर्पानेट (Advanced Research Projects Agency Network) या नावाने ओळखले जात असे.
अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गोष्टींमधल्या कोणत्याही तीन निवडा, असा प्रश्न जर आजच्या तरुण पिढीला केला, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनपैकी ते कोणता गाळतील, हे सांगणं अवघड आहे. एक नक्की की, कोणत्याही परिस्थितीत ते इंटरनेट वगळणार नाहीत. कारण त्यांचा प्रत्येक श्वास आज प्राणवायूपेक्षा इंटरनेटच्या साह्यानं चालतो आहे. त्याची जीवनावश्यकता एव्हाना जगाने ओळखली आहे.
एक दिवस असा येणार आहे, की संपूर्ण पृथ्वी ही मोफत वाय फायने युक्त असेल. एव्हरेस्टसारख्या एखाद्या उंच ठिकाणी कदाचित प्राणवायू मिळणार नाही; पण वाय फायचा सिग्नल खात्रीपूर्वक मिळताना दिसेल. आज ते अतिरंजित वाटले, तरी नजीकच्या भविष्यकाळात ते होणार, हे निश्चि्त आहे.
आजची तरुण पिढी संपर्कासाठी इंटरनेटचा वापर अफाट करीत असते. व्हॉट्सअँपसारखं अँप्लिकेशन हे त्याचं उदाहरण. फेसबुकवर आज जितकी सुखदु:खं व्यक्त होतात, तेवढी समक्ष भेटीतही होत नाहीत, हे आजचं सत्य आहे. जगभरातील विविध समाज, गट हे इंटरनेटमुळे एकमेकांशी संपर्क साधू शकतात. सामाजिक अभिसरण वाढले आहे.
ज्ञानाचे भांडार आज सर्वांसाठी खुले झाले आहे. आपण सेकंदामध्ये आपले मत, फोटो किंवा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो. सामाजिक जाळ्यामुळे (सोशल नेटवर्किंग) एकमेकांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. आता मोबाईल मध्येही इंटरनेटचा वापर सुरू झाल्याने ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे.
तरुण पिढी आज अशा एका वेगळ्या ‘पॅराडाइम शिफ्ट’ मधून जात आहे. २४ तासांपैकी ९०% वेळ त्यांचे डोळे या ना त्या स्क्रिनवर रोखले गेलेले दिसतात. स्क्रीनवर रोखले गेलेले डोळे बाजूला करून त्यांनी आजूबाजूच्या वेगवान जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं आवश्यक आहे.
आजच्या तरुण पिढीसमोर प्रचंड ज्ञान, संपर्काचं प्रचंड सुख, छायाचित्र, संगीत, ध्वनी, चलचित्रपट वगैरेंनी उदंड भरलेलं चविष्ट ताट इंटरनेटनं ठेवलं आहे. बसल्या जागी मोबाईल मधून ते मिळत आहे. तरुण पिढीनं काळजी घ्यायची आहे ती आपल्या प्रकृतीची.
संकलन व संकल्पना-एजाज मौजन
साभार-नेट