श्रमदान करून भुयारी मार्ग स्वच्छ केले व ५४० टोपले माती काढली
लातुर:-छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भुयारी मार्गातून स्वच्छता मोहीम अंतर्गत चक्क ५४० टोपले माती गोळा केली.
आणि विशेष म्हणजे तीही फक्त एका बाजूनेच… दुसरी बाजू स्वच्छता करणे बाकी आहे. आज ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी लातूर शहरातील भुयारी मार्गाची स्वच्छता केली.कित्येक महिन्यांपासून भुयारी मार्गात रस्ता दुतर्फा मातीचे थर साचले होते, काही ठिकाणी एक फूट उंचीचे थर होते. चिखल माती, दारूच्या बाटल्या, केरकचरा, प्लास्टिक पिशव्या हे सर्व गोळा करूननालीमध्ये जमा असलेली माती उकरून उकरून काढली. चेंम्बर स्वच्छ केले.
यात अक्षरशः ५४० टोपले माती जमा झाली. आज सर्व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
मागील कित्येक महिन्यांपासून याठिकाणी स्वच्छता करण्यात आली नव्हती. या अस्वच्छता, पाणी, माती, चिखल यामुळे येथे दररोज २-३ अपघात होतात, मागील महिन्यात एक मृत्यू देखील झाला होता.
या स्वच्छता मोहीम करिता मनपा घंटा गाडी कर्मचारी व त्यांचे प्रमुख स्वयंप्रकाश वैरागे यांनी जमा केलेली माती, कचरा उचलून नेण्यास सहकार्य केले.या स्वच्छता मोहीम कार्याची माहिती केंद्रीय गृह निर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांना पाठवण्यात आली आहे.यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, वैशाली यादव, पदमाकर बागल, नितीन कामखेडकर, मुकेश लाटे, अभिषेक घाडगे, दीपक नावाडे, बाळासाहेब बावणे इत्यादि सदस्यांनी परिश्रम घेतले.
भुयारी मार्गात गतिरोधक असावेत, नियमितपणे चेंबर स्वच्छ करावेत, लाईट व्यवस्था असावी, दररोज सफाई असावी अशी मागणी डॉ. पवन लड्डा यांनी केली आहे.