“विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आलेत तर त्यांचं स्वागत आहे. मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू,” असा इशारा शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी दिला. मुंबईत PRESS घेऊन, संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची म्हणजेच शिवसेनेची भूमिका मांडली.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी माझी काल मुख्य प्रवक्ते म्हणून निवड केली. कालपासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादा चर्चेचा विषय आहेत. त्यांचा फोन नॉट रिचेबल लागणे हे नवीन नाही. दादांची नाराजी आणि आमच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा काही संबंध नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
पार्थच्या पराभवापासून दादा नाराज
दादांची नाराजी पार्थ पवारांच्या पराभवापासून आहे. राष्ट्रपती लागवट उठवण्यासाठी शरद पवारांनी अजितदादांना मोहरा केलं. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दादांचं स्थान शोधावं लागतंय. टाईम साधणारा नेता अशी ओळख असलेल्या नेत्याला बोलूही दिलं जात नाही. दादांना बोलू दिलं असतं तर काय झालं असतं? 54 आमदारांचे पाठबळ असलेल्या नेत्याला साईड केलं जातंय, हा त्यांचा अपमान आहे. धनंजय मुंडेंनी मला एक किस्सा सांगितला होता. माजी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा त्यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली होती. त्यावेळी दादांनी ते मलाच भेटत नाही, तुला काय भेटणार असं अजितदादांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादी पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यांची नाराजी आता बाहेर पडू लागली आहे आमच्याप्रमाणे. ज्यासोबत जायचं आहे, त्यांच्या भूमिका दादांना स्वीकाराव्या लागतील. दादांची ताकद आता राष्ट्रवादीत पवारसाहेबांपेक्षा जास्त वाढलेली आहे. विधानभवनात ज्या पद्धतीने आमदार भेटायला त्यावरुन दादांच्या ताकदीचा अंदाज लावावा, असं संजय शिरसाट म्हणाले.