• Sun. Jun 15th, 2025

कोरोना उद्रेकाला पुन्हा सुरुवात, साताऱ्यात मास्कसक्ती, पुण्यातलं प्रशासन मात्र गाफील

Byjantaadmin

Apr 4, 2023

पुणे : जगभरात कोरोना बाधित रुग्णाचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी भारतात मात्र अजूनही हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होतीये. महाराष्ट्रातही आजघडीला शेकडो रुग्णांना कोरोनाची बाधा होतीये. साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे. मागील आठवडाभरात साताऱ्यात पन्नासहून अधिक रुग्णांची नोंद झालीये. असं असतानाही शेजारील पुण्यात मात्र रुग्णालयातली परिस्थिती धक्कादायक आहे आणि प्रशासन देखील बेफिकीर आहे

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना लशींचा तुटवडा वाढत असल्याचं चित्र आहे. पुण्यातल्या महापालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. ससून हॉस्पिटल, नायडू रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय, सुतार हॉस्पिटल या पुण्यातल्या महापालिकांच्या रुग्णालयांत सध्या LASIKARAN  बंद आहे.

पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. पवार यांनी पुण्यातल्या लसीकरणाबाबतचं वास्तव सांगितलं. ३१ मार्चपर्यंत कोव्हॅक्सिन लस होती. मात्र सध्या लशींचा तुटवडा आहे. लस उपलब्ध नसल्याने सध्या रुग्णालयातलं लसीकरण केंद्र बंद आहे पर्यायाने लसीकरणाला देखील ब्रेक लागला आहे. तसेच महानगरपालिकेच्या कोणत्याही रुग्णालयांत लस नसल्याने तेथीलही लसीकरण केंद्रे बंद आहेत. महापालिकेच्या वतीने राज्य सरकारकडे लसींची मागणी केलेली आहे. सध्यस्थितीत लस उपलब्ध नसली तरी पुढच्या चार ते पाच दिवसांत राज्य शासनाकडून लस मिळाल्यानंतर पुन्हा लसीकरण केंद्रे सुरु केली जातील, अशी माहितीही डॉ. पवार यांनी दिलीये.

२५ हजार लसींचे डोस राज्य शासनाकडे मागितले

सध्या लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांना देखील लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद असल्याचीच माहिती देत आहोत. सध्या पहिल्या किंवा दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या तशीही कमी आहे. बुस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरात सरासरी ४० ते ५० डोस सध्या घेतले जातात. म्हणजेच सध्याची परिस्थिती पाहिली तर तेवढी आवश्यकताही नाहीये. पण खबरदारीचा उपाय म्हणून आपण २५ हजार लसींचे डोस राज्य शासनाकडे मागितले आहेत, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. देशामध्ये १८ हजारांच्या आसपास कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. राज्यात दररोज शेकडो रुग्ण सापडत आहेत. राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंतेची बाब असून यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहे, मात्र नागरिकांनी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत कोरोनात घालून दिलेल्या पंचसुत्रीचा अवलंब करावा, असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *