मुंबई : ठाकरे गटाचे खासदार(Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, आत्तापर्यंत 17 कारखान्यांची प्रकरणं माझ्याकडे आली आहेत. त्यातलं हे पहिले प्रकरण हक्कभंग समितीचे अध्यक्ष यांचाच कारखाना असणं हा केवळ योगायोग आहे. सहकारी कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. हजारो शेतक-यांची लूट झाली आहे. त्याचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले आहेत.
भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत. माझ्याकडे 17 कारखान्याचे कागदपत्रे आहेत. त्यापैकी राहुल कुल यांचा एक कारखाना आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते सदानंद कदम यांना अटक केली आहे. राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत. भीमा सहकारी प्रकरण किरीट सोमय्यांकडे चारवेळा पाठवले. त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आहे. पण सोमय्या म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसबद्दल प्रकरणे घेऊन या तरच मी हात लावतो. राहुल कुल हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत का नाही मला माहिती नाही. मी काही त्याची माहिती घेतली नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.
शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात महाविकासआघाडीचा कुठलाही संबंध नाही. मुळात जाहीर कार्यक्रमात जे अश्लील वर्तन करतायत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा,अशी मागणी देखील संजय राऊत म्हणाले.