बालविवाह प्रतिबंध उपक्रम सामाजिक
चळवळ होणे काळाची गरज
– पालकमंत्री तानाजी सावंत
- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
उस्मानाबाद, (जिमाका) : बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री. तुळजाभवानी क्रीडा संकुल मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आदींची यावेळी उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून पालकमंत्री सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना सर्वप्रथम अभिवादन केले. संदेशात ते म्हणाले, आपल्या देशात भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. म्हणून आपण हा प्रजास्ताक दिन लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करतो.
उस्मानाबाद जिल्ह्यातील देवधानोरा, नंदगाव, चिलवडी या गावांनी इतिहास रचला. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे व यापुढेही राहील.भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य मिळविणे एवढेच ध्येय समोर न ठेवता समग्र विकासाचा ध्यास त्यांनी धरला होता, तो ध्यास लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे व ती जबाबदारी आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण करूया.
उस्मानाबाद जिल्हा नेहमीच स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर आहे. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अनेक वाईट प्रथांवर देशाने मात केली पण अजूनही बालविवाह प्रथा पूर्णपणे संपलेली नाही. या प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, निम-शासकीय, खासगी संस्था, तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा सक्रीय सहभाग मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा हा पूर्णपणे बालविवाह मुक्त जिल्हा व्हावाया उद्देशाने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बालविवाह मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील स्त्री, पुरुष जन्म दरांतील तफावत हा चिंतेचा विषय आहे. त्याबाबतही आपण जागृत होऊन इथून पुढे स्त्री भ्रूण हत्या होणार नाही हाही यासाठी पुढाकार घेवूया, असे आवाहन मंत्री डॉ.सावंत यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचे मुल्य पाळताना संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव ठेवायला हवी. हे भान आपल्याला संविधान देते. आज ज्या दिवसाने आपल्याला हे सर्व स्वातंत्र्य बहाल केले तो वर्धापन दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, असेही प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये तायक्वांदोमध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल श्रीमती अश्विनी पाउडशेटे आणि बॉक्सिंगमध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल सारिका शिवाजी जटाळे यांचाही यावेळी पालकमंत्री सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये बेलेश्वर विद्यालय पखरुडचा ओमराजे चव्हाण हा 97.31 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून चौथा आणि जिल्हा परिषद ताकविकी येथील साई शिंदे हा 95.30 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून सातवा आल्याबद्दल यांचाही गौरव करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीमध्ये शेकापूर येथील ग्रीनलँड पब्लिक स्कूलमधील सानवी कैलास गिलबिले ही 87.24 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून दहावा आणि तुळजापूर जवाहर नवोदय विद्यालयातील स्नेहा कवडे हा 84.56 टक्के गुण मिळवून सीबीएसई बोर्डातून आठवा आल्याबद्दल त्यांचाही सन्मापत्र देऊन गौरव करण्यात आला.