नवी मुंबई, : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांची भाजप आमदार नितेश राणे यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली आहे. ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.
‘कामाख्या देवीकडे जाऊन जादू टोणा करून सत्ता आणली पण ती टिकणार नाही. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुम्ही कामाख्या देवीला जाता, कारण तिकडे जादूटोणा चालतो म्हणून,’ असं विद्या चव्हाण म्हणाल्या. जागर महागाईचा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेवेळी विद्या चव्हाण बोलत होत्या.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत तर स्वराज्य रक्षक आहेत,असं वक्तव्य अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलं. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. भाजप आमदार नितेश राणे यांनी अजित पवारांचा उल्लेख धरणवीर असा केला, तसंच नितेश राणे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करून आंदोलन केलं.
नितेश राणे यांचं हे आंदोलन आणि टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्याची उंची किती तो बोलतो किती?’, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं