संच मान्यतेसाठी यावर्षीही ३० सप्टेंबर ची पटसंख्या ग्राह्य धरावी : लायक पटेल
लातूर : शासनाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी दि. ३१ जुलै २०२५ ची पटसंख्या ग्राह्य धरण्यात येईल असे कळविण्यात आले होते. परंतु असे न करता दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दि. ३० सप्टेंबर चीच पटसंख्या ग्राह्य धरण्यात यावी, अशी आग्रही मागणी शिक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य चिटणीस लायक पटेल यांनी केली आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत दरवर्षी ३० सप्टेंबरची पटसंख्या ग्राह्य धरून संचमान्यता करण्यात येत होती. परंतु शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी दि. ३१ जुलैची पटसंख्या ग्राह्य धरण्यात येईल, असे शासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. यामुळे राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कारण अजून सगळीकडेच इयत्ता पहिली ते बारावीचे प्रवेश सुरु आहेत. आधारकार्ड काढणे,जन्म नोंदणी दाखले वेळेत मिळत नाहीत. ग्रामीण भागात शेतकर्यांची कामे सुरु असल्याने प्रवेश कागद पत्र वेळेत मिळत नाहीत. शिक्षक बदली होत आहेत. त्यातच इयत्ता अकरावीचे यावर्षी पासून ऑनलाइन प्रवेश सुरू केल्यामुळे त्यात अनेक तांत्रिक दोष असल्यामुळे पन्नास टक्केही प्रवेश आजपर्यंत होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ३१ जुलैला सुद्धा राज्यात हजारो विद्यार्थी यू–डाइसच्या बाहेर राहणार असल्याकारणामुळे ही मुदत पूर्वीप्रमाणे ३० सप्टेंबर २०२५ करावी, अशा मागणी आपण एका निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांच्याकडे केली केली आहे. तसेच फोनवर त्यांच्याशी याबाबत चर्चा करून या विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार लवकरच याबाबत अपेक्षित निर्णय होईल,असा विश्वासही लायक पटेल यांनी व्यक्त केला आहे.
