६२ ग्रा.पं.साठी निलंगा तालुक्यात शांततेत मतदान
निलंगा / प्रतिनिधी
रविवार (दि १८) रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निलंगा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत एकुण ६६ टक्के मतदान झाले असून साडेपाच वाजेपर्यंत 75.75 टक्केच्या घरात मतदान झाला आहे.
निलंगा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतमधील थेट सरपंचपदाच्या ६१ जागेसाठी व ४९७ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. गावात आपलेच वर्चस्व राखले जावे यासाठी निवडणूक कार्यक्रम लागल्यापासून गाव पुढाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर शनिवार आणि रविवारी मतदारांची जुळवाजुळव सुरू झाली होती. अनेक गावात निवडणूका अत्यंत चुरशीच्या झाल्याने एका एका मतासाठी उमेदवारांनी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा प्रथमच गावागावात पक्षीय राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक गावात आपल्या विचाराचे पॅनल निवडून यावे यासाठी नेतेमंडळीकडुन प्रयत्न करण्यात आले. दि १८ रोजी सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. तालुक्यातील पानचिचोली व दापका येथे मोठी चुरस असल्याने त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः पोलीस अधीक्षक मंडे यांनी या दोन्ही गावातील केंद्राला भेटी दिल्या. दापका येथे किरकोळ बाचाबाची सोडली तर सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६ टक्के विक्रमी मतदान झाले तर साडेपाच पर्यंत ७५.६० टक्केच्या घरात मतदान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तालुक्यातील अंबुलगा (वि) येथील एका बुथवर वरील मशीन सायंकाळी साडेचार वाजता बंद पडल्याने थोडावेळ मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. त्या ठिकाणी साडेपाच पर्यंत आलेल्या सर्व मतदारांना चिठ्या देऊन साडे सहा वाजेपर्यंत मतदान करुन घेतल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील जाऊ येथील मतदान केंद्रावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर पानचिंचोली येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके तर शेडोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडितराव धुमाळ यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.