मुंबई : विधानसभा निवडणुक तोंडावर असताना भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन संकटात सापडले आहेत. महिला पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबत नवटके यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांचेही नाव घेतलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या. जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये त्रुटी ठेवल्याप्रकरणी नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नवटके यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, महाजने हे लाभार्थी असल्याचं उघड झाल्याचा दावा केला आहे, तर रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधित व्यक्तीवर कारवाई केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं नवटकेंनी याचिकेमध्ये म्हटलं आहे.२००७ मध्ये भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय पतसंस्थेमध्ये १ लाख ६९ हजार ठेवीदारांच्या १२०० कोटींचा अपहार झाल्याचं उघड झालं होतं. २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या उपनिबंधकांनी जितेंद्र कंदारेंना अवसायक नेमलं होतं. कंदारे यांनी कर्जाच्या बदल्यात ठेवी एकरूप करण्याची बेकायदान योजना राबवली, यामध्ये ठेवीदारांना ३० टक्के मोबदला तर कर्जदार आरोपींना जास्तीचा फायदा करून दिल्याचं उघड झालं होतं. याप्रकरणी २०२० साली पुण्यातील डेक्कन, आळंदी, आणि शिक्रापूर येथे तक्रार दाखल झाल्यावर कंदारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्त्वात एसआयची पथकाची स्थापना केली होती. या पथकाने जळगाव येथे छापे टाकत अनेकांना अटक केली. यामध्ये महाजन यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र पाटील आणि निलेश झाल्टे यांनी अनुक्रमे ५० लाख आणि ७० लाख रूपयांचे कर्ज मंजूर झाले, त्यांना महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जामीनदार असून ही कर्ज बुडवण्यात आली. यामध्ये महाजन हेसुद्ध लाभार्थी असल्याचं भाग्यश्री नवटके यांनी म्हटलं आहे.
२९ जुलै २०२२ ला हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित केला गेला. त्यावेळी राज्यात सत्ता बदल झाला होता, उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे फक्त आळंदी पोलीस ठाण्यातील तपाल हस्तांतरित झाला होता. यादरम्यान राज्यात म्हाडा, टीईटी आरोग्य खात्यातील भरती घोटाळ्याप्रकरणी पंकज घोडे या व्यक्तिला अटक केली. परंतु पंकज घोडेला अटक झाल्यामुळे माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप भाग्यश्री नवटके यांनी केला. त्यावेळी माझी राज्य राखील पोलीस दलाच्या अधीक्षक म्हणून चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. ३ जानेवारी २०२४ ला नव्या महासंचालकांची नियुक्ती झाल्यावर घोटाळ्यातील आरोपींनी माझ्याविरूद्ध गुन्हे दाखल केले. गुन्हे अन्वेषण विभागाने अहवाल सादर केल्यावर त्याची शिफारस करण्यात आली त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं भाग्यश्री नवटके यांनी याचिकेत म्हटलं आहे.
महाजनांनी फेटाळले आरोप

ही पतसंस्था बहुराज्यीय असल्यामुळे केंद्र सरकारच्या निबंधक कार्यालय आणि पोलीस महासंचालकांची परवानगी आर्थिक गुन्ह्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. मला अडकवण्यासाठी करण्यात आलेलं षडयंत्र आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव न घेता तपास करणं अपेक्षित असतं. मी आणि माझ्या पत्नीने एक रूपयाचेही कर्ज घेतले नसून तपास सीबीआय आणि न्यायालयातही हे प्रकरण असल्याने सत्य लवकरच बाहेर येईल, असं म्हणत गिरीश महाजनांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.