केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनशनिवारी (दि. 16) मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. देशात एकूण सात निवडणुका होणार आहेत. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाली की आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू होते. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहते. आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईलाही सामोरे जावे लागते. आता रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार
आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह CONGRESS नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
…तर काँग्रेसचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार
भाजप जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल आहे. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आचारसंहिता काळात कोणत्या कामांवर असते बंदी?
आचारसंहिता काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. कुठल्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येत नाही.सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश काढता येत नाहीत. परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत. धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. निवडणुकीच्या प्रचार करताना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास मनाई असते.