शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन NASHIK करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकरी प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे.

आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर?
नटसम्राट आज करावे लागले तर वेगळ्या पध्दतीने करेल. नाटसम्राटाचे दुःख जे आहे ते चार भिंतीमधील आहे. गोंजारलेले दुःख आहे, आम्ही मात्र सर्व आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते, त्याचा एक रास्त भाव आहे तो द्या, यापलीकडे काय मागणे मागितले. काय ते मागू नका, आता सरकार कोणते करायचे ते ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात ते ओठात येते, मला पक्षातून काढतील.
कुठला आदर्श ठेवता तुम्ही आमच्या पिढीसमोर?
महिनाभरात सर्व पक्ष संपलेले असतील, येथे मनापासून बोलता येते. यांना कधी कळणार की मृत्यू येणार, किती तो संचय करायचा, अमर असल्यासारखे काय वागतात, कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे, असे म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मला शेतकऱ्याचा जन्म नको, असं शेतकरी कधीच म्हणणार नाही
कशाच्या आशेवर जगायचे, रोज अन्न देणारा जो आहे त्यावही तुम्हाला पत्रास नाही मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची. अडवणूक नाही, काहीही झाले तरी, शेतकरी कधीच अडवणूक करणार नाही. आत्महत्या केली तरी परत जन्मून मी शेतकरीच होणार, अशी जात आहे. मला शेतकऱ्याचा जन्म नको असे शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा काळत नाही का? आणि हे कधी संपणार, वर्षानुवर्ष हेच चालत आले आहे. कसले स्वातंत्र्य, एका गुलामीतुन दुसऱ्या गुलामीत चाललो आहे. शेतकऱ्याची गुलामी संपायला तयार नाही. त्या गुलामगिरीच्या विरोधात लिहा, असेही त्यांनी म्हटले आहे.