अहमदनगर : दिल्लीत जाण्यासाठी भाजपला शेतकऱ्यांची मते हवे असतात, मात्र आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो. अशा भाजपला आगामी निवडणुकीत जनता अजिबात थारा देणार नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा आजपासून नगर जिल्हा दौरा सुरू झाला आहे. दुपारी नेवासा तालुक्यात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ठाकरे यांचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी जेसीबीतून फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोनईतील जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्यावतीने जनसंवाद मेळावा झाला. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार शंकराव गडाख, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, संदेश कार्ले उपस्थित होते.
भाजपचं हिंदुत्व घरं पेटवणारं
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, सुमारे वीस ते पंचवीस वर्षे शिवसेना भाजपची युती होती. मात्र ही वर्षे अक्षरश: सडली आहेत. तेव्हा हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही भाजपसोबत गेलो. मात्र नंतर कळाले की, त्यांचे हिंदुत्व वेगळे आहे. भाजपचे हिंदुत्व घर पेटविणारे आहे. तर आमचचे हिंदुत्व सामान्य माणसाची चूल पेटवणारे आहे, असे ठाकरे म्हणाले.