मुंबई: अभिनेत्री तेजस्विनी पंडित मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच तिने विविध विषयांवरील कलाकृतींची निर्मितीही केली आहे. मात्र अलीकडच्या काळात अभिनेत्री तिने एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमुळे ती अधिक चर्चेत राहिली आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर अभिनेत्रीने एक्सवर भाष्य केले आहे. अलीकडेच तिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.तेजस्विनीने एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘जनता मूर्ख नाही. सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे!’ अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या विशेष चर्चेत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करत तिच्या मताला सहमती किंवा विरोध दर्शवला आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये तिने कोणाचेही नाव घेतलेले नाही.


जनता मूर्ख नाही.
— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !
अभिनेत्रीच्या पोस्टवरील कमेंट
अभिनेत्रीच्या पोस्टवर एकाची कमेंट अशी आहे की, ‘म्हणूनच जनतेने कधी तुमच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांना कधी साथ दिली नाही’. एका युजरने सवाल केला की, ‘कोणती जनता तेजस्विनी? जी मंदिर आणि धर्म मध्ये अडकली आहे…’ अन्य एक कमेंट अशीही आहे की, ‘बरोबर. २०१९ ची निवडणूक आणि मतदान लक्षात आहे लोकांच्या!’ दरम्यान ज्याप्रमाणे या पोस्टवर अभिनेत्रीला पाठिंबा देणाऱ्या कमेंट आहेत, त्याचप्रमाणे तिला ट्रोलही करण्यात आले आहे.तिने ही पोस्ट करताना कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती आणि एकंदरित आलेल्या कमेंट पाहून अभिनेत्रीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबद्दल भाष्य केल्याचं दिसतंय. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर तिचे हे ट्वीट समोर आले आहे. याच विषयावर तिची ही पोस्ट असावी. शिवाय अभिनेत्रीने याआधी लेखक अरविंद जगताप यांची पोस्टही रीपोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं लिहिले आहे की, ‘घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही. हा जमाना आकड्यांचा आहे’.