• Tue. Apr 29th, 2025

वेध लोकसभा निवडणुकीचा : हेमंत पाटील यांचं काय होणार? हिंगोलीत काँग्रेस की ठाकरे गट लढणार?

Byjantaadmin

Feb 2, 2024

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे आता जोमात वाहत असून मागच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा खासदार या जागेवर विजयी झाला असल्याने अर्थातच शिंदे गट ह्या मतदारसंघात आपला प्रबळ दावा सांगत आहे. हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून शिवाजी माने यांच्या रूपात शिवसेनेला हिंगोलीमधून पहिला खासदार मिळालेला असताना त्यानंतर सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील हे सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारीवर हिंगोली लोकसभा मतदार संघामधून विजयी झाले आहेत. मात्र आता सत्ता संघर्षामध्ये शिवसेनेची फूट पडल्याने शिंदे शिवसेनेला मतदार किती पसंती देतात याकडे सर्व सर्वांचं लक्ष लागलेले आहे.राज्यातील सत्ता संघर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग स्वीकारून विरोधी पक्षात असलेल्या भाजप पक्षासोबत एकत्र येऊन आपली वेगळी चूल मांडली. याचवेळी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यासह केंद्रात सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे खासदार हेमंत पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. आता लोकसभेचे वारे वाहत असताना खासदार हेमंत पाटील हे जोमाने कामाला लागले असून पुन्हा लोकसभेत एन्ट्री करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे काही नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. इकडे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकासआघाडीच्या उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी देखील जोमाने तयारी सुरू केली असून पक्षीय तिढा अद्यापही सुटत नसल्याचं बघायला मिळत आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न व समस्या

हिंगोली मतदारसंघातील एक ना अनेक समस्या आहेत. उद्योगाच्या क्षेत्रात मागास असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने व बेरोजगारीमुळे या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर बाहेरील जिल्ह्यात स्थलांतर होते. हिंगोली जिल्ह्यांमधून केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला मात्र जिल्ह्याला कुठेही थेट संपर्क नाही. शेतकऱ्यांना शेती सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यात तीन धरणे आहेत. मात्र जिल्ह्यासाठी हवा तसा सिंचनाचा उपयोग होत नाही. याशिवाय अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. लिगो प्रकल्पाचं काम अजून पूर्ण नाहीये. एमआयडीसी उद्योग प्रश्न, तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये, मेडिकल कॉलेज अपूर्ण आहेत, महिलांसाठी पूर्ण सुविधा उपलब्ध नाही. हळद संशोधन प्रकल्प येऊ पाहतोय. परंतु तो अजूनही पूर्ण नाहीये. रेल्वेचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीला वन्य प्राण्यांचा त्रास आदी इत्यादी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत.

हिंगोली लोकसभा उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच

हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला सुरुवात केली असून यामध्ये अनेक ठिकाणी भेटी देणे, बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे, पक्ष बांधणीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत व नागरिकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचबरोबर विद्यमान खासदार असताना भाजपाचे काही नेते लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी करताना बघायला मिळत आहेत. यामध्ये रामदास पाटील सोमठाणकर यांच्या प्रामुख्याने नावाची चर्चा आहे. माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, श्रीकांत पाटील, योगी शाम भारती महाराज, माजी खासदार शिवाजी माने यापैकी अनेक नेत्यांनी लोकसभेची भाजपाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. यात मतदारांच्या भेटी घेणे, अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे.

महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार

हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, व महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष मिळून लढवणार अशाच पद्धतीचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या जागेवर दावा करत असून उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते मतदार संघात तयारीला लागले आहेत.

हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब मगर, संदेश देशमुख, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, रुपालीताई पाटील डॉ. बी. डी. चव्हाण हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेते इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, दिलीप चव्हाण तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव, डॉ. अंकुश देवसरकर, ॲड. सचिन नाईक या इच्छुकांनी महाविकास आघाडीकडून मतदारांच्या भेटीला सुरूवात केली आहे.

२०१४ ते २०१९ पर्यंत हिंगोली लोकसभा निवडणूक

शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांची २०१४ च्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्याशी थेट लढत झालेली होती. त्यावेळच्या निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना केवळ १६३२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. ऐन मोदी लाटेत केवळ महाराष्ट्रातून हिंगोलीचे राजीव सातव आणि नांदेडचे अशोक चव्हाण हे दोन खासदारच काँग्रेसमधून संसदेत जाऊ शकले.

लोकसभा निवडणूक २०१९ ला काँग्रेस पक्षाकडून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. जे आधी विरोधी पक्षाकडून लक्षले होते. निवडणुकीआधी त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ऐनवेळी काँग्रेसने देखील त्यांना तिकीट जाहीर केलं. त्यामुळे अनेक कार्यकर्ते यावर नाराज होते. या सगळ्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला. भाजप शिवसेना युतीचे हेमंत पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळी दुहेरी लढत झाली होती. या लढतीत वानखेडे यांचा पराभव झाला होता. हेमंत पाटील यांनी पहिल्यांदाच लोकसभेत पाऊल ठेवलं होतं. वानखेडेंना सलग दुसरा पराभवाचा धक्का बसला.

हिंगोली जिल्ह्यातील विधानसभानिहाय सद्यस्थितीहिंगोली जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यात हिंगोली लोकसभेतील

हिंगोली जिल्ह्यातील १) हिंगोली २) कळमनुरी ३) वसमत विधानसभा, नांदेड जिल्ह्यातील ४) किनवट ५) हदगाव विधानसभा व यवतमाळ जिल्ह्यातील ६) उमरखेड मतदारसंघाचा समावेश केला गेला आहे.लोकसभेच्या या निवडणुकीला स्थानिक उमेदवारच द्यावा अशी मागणी देखील नागरिकांमधून केली जात आहे. नांदेड येथे वास्तव्याला असलेले हेमंत पाटील यांची अनेक वेळा मतदार संघातील नागरिकांची भेट होत नाही, असा सूर नागरिकांमधून उमटला जातो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी मतदारसंघातूनच स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी नागरिकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed