मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे, असं त्यांनी मला कळवलं आहे. तिथे स्टेज उभारणीचं कामही सुरू आहे, त्यामुळे मी इथून आझाद मैदानात जाणार आहे. दरम्यान वाटेत जर शासनाच्या शिष्टमंडळाने चर्चा करण्यासाठी आले तर नक्की चर्चा करेन, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. आमचे आणि मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, हे सरकारच्या हातात आहे, असं सांगताना मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं सांगत उपोषणासाठी पोलिसांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. त्यानंतर काही क्षणांतच मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळा येथून माध्यमांशी संवाद साधला. आम्ही मुंबईला मजा करायला येत नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही घरी जातो, असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला.”रात्री लोणावळ्यात मुक्काम केलाय, अजूनही लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे. आपण यातून मार्ग काढा. तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या…”, असं जरांगे म्हणाले.
