शिंदे सरकारच्या भवितव्याचा निर्णय उद्या
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या (दि.२९ सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुभाष देसाई यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होणार असून या सुनावणीकडे महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक हे उद्या ठरण्याची शक्यता आहे. याबरोबरच सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार ठाकरे गट आणि शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत.
याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुरू असलेली सुनावणी सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानंतर २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगासमोर पक्षाच्या चिन्हाबाबतचा वाद सुरू आहे.
दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाच्यावतीने संजय किशन कौल तर ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडे महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. या सर्व घटनात्मक मुद्द्यासंदर्भात सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता आहे.