• Wed. Aug 13th, 2025

प्रिया सिंह प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, अखेर अश्वजित गायकवाडला बेड्या

Byjantaadmin

Dec 18, 2023

ठाणे : घोडबंदर रोड येथे वादावादीनंतर तरुणीला शिवीगाळ आणि बेदम मारहाण करणारा तिचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांना रविवारी रात्री कासारवडवली पोलिसांनी अखेर अटक केली. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. एमएसआरडीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मुलासह त्याच्या मित्रांनी हे कृत्य केल्याची तक्रार पीडितेने दिली असून या घटनेला तब्बल एक आठवडा उलटूनही पोलीस तपासात गती नसल्याने विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी एसआयटी नेल्यानंतर तरी तपासाला गती मिळणार का, असा सवाल पीडितेकडून विचारला जात आहे. या तरुणीची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाण्यातील खासगी रुग्णालयात रविवारी आले होते. त्यांनी तरुणीशी संवाद साधल्यानंतर पीडितेला लवकरात लवकर न्याय द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरून जाब विचारू, असा इशारा दानवे यांनी सरकारला दिला.
सोशल मीडिया स्टार असलेल्या पीडितेला ११ डिसेंबर रोजी तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओवळा येथे भेटायला बोलवले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्वजितने तिला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. तिच्या हाताचाही चावा घेतला. गायकवाड याच्या रोमील पाटील व सागर शेळके या मित्रांनी पीडितेला गाडीने धडक दिल्याचे तिने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही समाज माध्यमांवरून टीका सुरु होती.अखेर पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली. या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. तपासादरम्यान आणखी तथ्य समोर आल्यास पुढील कलमांचा समावेश केला जाईल, असे सिंह यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. रविवारी रात्री या प्रकरणातील आरोपी अश्वजित गायकवाड, रोमील पाटील, सागर शेळके या तिघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

Priya Singh Case Thane Police SIT arrests the main accused Ashwajit Gaikwad vehicle used in the crime was also seized

 

राज्यात महिला सुरक्षित आहेत काय?

या दुर्घटनेत तरुणीचे हात व पाय फ्रॅक्चर झाले आहेत. एखाद्या मुलीला थेट गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. याचा अर्थ या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? सामान्य माणसाला कुणी काठीने मारले तर लगेच गुन्हा दाखल केला जातो. मात्र या प्रकरणात एवढी गंभीर घटना घडूनही ३०७ कलम का लावले नाही? कायदा व सरकार तुमच्या घरचे आहे का, असा प्रश्न पीडितेची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना विचारला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य महिला आयोगाने घेतली दखल

ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, असे या प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *