• Thu. Jun 19th, 2025

लातूर जिल्ह्यात राबविले जाणार  ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

Byjantaadmin

Dec 16, 2023

लातूर जिल्ह्यात राबविले जाणार  ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

लातूर,(जिमाका) : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे.

सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. अभियानासाठी शाळांची विभागणी अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत प्रत्येक स्तरातील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

शाळांना गुणांकन

अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन 45 दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी 60 गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी 40 गुण असे एकूण 100 गुण देण्यात येतील. या घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानात सहभागी शाळांचे मुल्यांकन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील शाळांना रोख रक्कम व पारितोषिक दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी केले आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *