सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच मध्यप्रदेश, छत्तीसगढ राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी 2024 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्याच्या हेतूनं (Congress) कंबर कसली असून निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. (Rahul Gandhi) यांनी यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि त्याचा फायदा पक्षाला कर्नाटक निवडणुकीत मिळाल्याचं दिसलं. अशातच आता राहुल गांधी लवकरच (Bharat Jodo Yatra) दुसरा टप्पा सुरू करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. याआधी मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये पदयात्रा काढणार आहेत.
मध्य प्रदेशात प्रचारासाठी राहुल गांधींचे कार्यक्रम
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात राहुल गांधींच्या आगामी कार्यक्रमांबद्दल बोलायचं झालं तर उद्या म्हणजेच, बुधवारी (8 नोव्हेंबर) ते अंबिकापूर, छत्तीसगड येथे असतील. यानंतर 9 नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील जबलपूर, 10 नोव्हेंबरला सतना आणि 13 नोव्हेंबरला भोपाळमध्ये कार्यक्रम आहे.
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा वेगळा असणार?
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ती यात्रा संपवली होती. भारत जोडो यात्रा 2.0 या वर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होऊ शकते आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत म्हणजे, तब्बल तीन महिने सुरू राहील. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल, असंही बोललं जात आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी संपूर्ण प्रवास पायी केला होता, तर यावेळी कुठे पायी आणि कुठे गाडीनं प्रवास पूर्ण करणार आहेत.