जालना: मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने गावागावात साखळी उपोषण सुरू आहेत. त्या साखळी उपोषणाचे आज आमरण उपोषणात रूपांतर झाले आहे. साखळी उपोषण आणि आमरण उपोषणासाठी मराठा बांधवांनी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला परवानगीचे अर्ज द्या म्हणजे सरकारला माहीत होईल की गावागावात आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू झाली आहेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं.
मनोज जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून पोटात अन्नपाणी नसल्यानं मनोज यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आता बोलताना त्रास होत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार न घेण्याचा निर्धार मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी केला आहे. आरक्षण हेच माझे उपचार असे म्हणत आपण आरक्षण घेऊच, पण कोणीही आत्महत्या किंवा उग्र आंदोलन करू नये असे आवाहनदेखील मनोज जरंगे यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे. शांततेच्या मार्गानेच मराठ्यांना आरक्षण मिळणार असून सर्वांनी आपली एकजूट कमी होऊ देऊ नका असंही मनोज जरांगे मराठा बांधवांना उद्देशून म्हणाले.