जातीनिहाय जनगणना व्हावी ही समाजातील सर्व घटकांची प्रमुख मागणी आहे. मात्र, धर्माच्या नावावर सुरू असलेले भाजपचे राजकारण त्यात उघडे पडेल, त्यामुळे त्यांचा याला तीव्र होत विरोध आहे, अशी टीका काँग्रेसच्या भटक्या विमुक्त विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. पल्लवी रेणके यांनी केली.काँग्रेसच्या भटक्या विमुक्त विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिक येथे झाली. या वेळी भाजपकडून सुरू असलेले विघातक व घटनाविरोधी राजकारण रोखण्याचे आवाहन करण्यात आले.
आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभर दौरा करण्यात येत आहे. पदाधिकाऱ्यांकडून मतदारसंघनिहाय राजकीय स्थिती समजून घेत, पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यात येत आहे. त्यासाठी ही बैठक झाली.
आगामी काळात भटक्या विमुक्तांची संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभर संघटन केले जात आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर जातीनिहाय जनगणना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार करेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष अॅड. रेणके यांनी सांगतिले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचा मेळावा नाशिक शहरात घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरच भटक्या विमुक्त त्यांच्या विभागाच्या जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. जे पदाधिकारी सक्रियपणे काम करतील, त्यांना कार्यकारिणीत संधी दिली जाईल, असे अॅड रेणके यांनी सांगितले.