• Wed. Jun 18th, 2025

देवेंद्र फडणवीसांनी २४ तासांत समजूत काढली, नीलेश राणे भाजपच्या सेवेत पुन्हा रुजू

Byjantaadmin

Oct 25, 2023

मुंबई: माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियावरुन ही घोषणा करताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. नीलेश राणे यांच्या या घोषणेनंतर भाजपच्या गोटात वेगवान हालचाली होऊन २४ तासांत नीलेश राणे यांची मनधरणी करण्यात पक्षाने यश मिळवले आहे. त्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण बुधवारी सकाळीच राणे कुटुंबीयांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर पोहोचले होते. याठिकाणी नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली.

Nilesh Rane BJP

त्यानंतर रवींद्र चव्हाण हे नीलेश यांना घेऊन थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर नीलेश राणे यांनी आपला राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेत भाजपच्या सेवेत पुन्हा रुजू होण्याची तयारी दर्शविली. फडणवीस यांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे एकत्रच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी नीलेश राणे यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करत पुन्हा असला प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही सर्वांसमक्ष नीलेश राणे यांना दिली. तर नीलेश राणे यांनी एकही शब्द न बोलता शांत राहणेच पसंत केले.

रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, नीलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर आम्हा सर्वांनाच धक्का बसला. यानंतर आम्ही नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नीलेशजींना नक्की काय घडलं, याबद्दल विचारणा केली. त्यानंतर आज सकाळी मी नीलेशजी यांच्याशी सगळ्या गोष्टींबाबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीसही त्यांच्याशी बोलले. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात आली की, संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते की, लहान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. याच प्रकारामुळे नीलेश राणे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यांचं असं मत आहे, छोटा कार्यकर्ता काम करतो, त्यांच्या अडचणी सर्व लोकांनी जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांची ही मागणी रास्त होती.

या गोष्टीचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. पक्षातील मोठे नेते अनेकदा आमदारकी आणि खासदारकी यासारख्या मोठ्या निवडणुकांचाच विचार करतात. परंतु, ग्रामपंचायतीसारख्या छोट्या निव़णुकांबाबत कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात. त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. त्या जाणून न घेतल्यामुळे नीलेश राणे नाराज होते. नीलेश राणे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेताआहे. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचत नसतील तर अर्थ नाही. याच दृष्टीकोनातून थोड्या रागाच्या भरात नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मी असेन, दादा असतील, फडणवीस असतील आणि नितेश आम्ही सगळ्यांनी मिळून या गोष्टीत लक्ष घालण्याचे आश्वासन नीलेश राणे यांना दिले. एक चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणं परवडणार नाही. मी त्यांना फार आग्रह केला, पुन्हा असं होणार नाही, अडचणी समजून घेऊ, असे त्यांना सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे आता नीलेश राणे यांच्या नेतृत्त्वात सिंधुदुर्गात आणि कोकणात भाजपचा झंझावात सुरुच राहील, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *