मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसीतून आरक्षण मिळू शकते. मराठा समाजाच्या आत्महत्या सातत्यानं होतं आहेत त्या सरकार अजुनही रोखू शकलेलं नाही. आरक्षण सरकार कसं देऊ शकते हे आम्ही आता समोर आणणार आहोत, असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सुनिल नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने सांगितले की, आयोग पुनर्रचना करून मागासलेपण सिद्ध करायला सांगायला हवे. सध्या केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाईल. आम्हाला हिंदू मराठा म्हणुन आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. कोर्टात केस चालू आहे असं सांगितलं जातं, किती दिवस हा प्रकार सुरू राहणार आहे? अशी विचारणा मराठा क्रांती मोर्चाने केली. सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह पीटीशन दाखल झाली आहे. या अनुषंगाने तत्काळ टास्क फोर्स सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
मनोज जरांगे दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत
कुणबी प्रमाणपत्र द्यावे म्हणून मागणी केली जात आहे. मनोज जरांगे दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या माध्यमातून घराघरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मागणी केली जात आहे. त्यांच्या बाजूला बसलेले किशोर चव्हाण हे बांधव आहेत. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी याचिका कोर्टात दाखल केली होती. परंतु कोर्टाने ती याचिका फेटाळी होती. त्यामुळं आमची मागणी आहे 50 टक्क्याच्या आत ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्यावं, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
गांभीर्याने विचार करावा नाही, तर परिणाम वाईट होईल
यावेळी बोलताना सुनिल नागणे म्हणाले की, आम्हाला आरक्षण द्या म्हणत असताना तुम्ही काहीच केले नाही. चाळीस दिवस उद्या संपत आहेत, सरकारने गांभीर्याने विचार करावा नाही तर परिणाम वाईट होईल. आरक्षण मरून मिळत नाही ते लढून मिळते. मराठा समाजाने आत्महत्येचा विषय सोडून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नागणे पुढे म्हणाले, आजवर जे जे आरक्षण दिलं ते टिकलं नाही. म्हणून सरकारने फसवणं सोडावे आणि त्या त्याभानगडीत पडू नये. सरकारच्या जीआरमध्ये मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असा उल्लेख आहे मग आता का नाही? सरकारने वेड्यात काढू नये, मी मराठा म्हणून आरक्षन द्यायला काय हरकत आहे? अशी विचारणा त्यांनी केली. सरकारने धोरण करणापूर्वी आमचेच लोक आत्महत्या करत आहेत ते पाहावे, सरकारने आरक्षणाच्या बाबतीत जे जे खरे आहे ते सांगावे आणि सिमोल्लंघन करा. धोरण आणि तोरण सत्य मार्गाने जाऊ दे. ईडब्लूएस जो मुद्दा आणला आहे तो किती उपयुक्त ठरेल माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.