नांदेड: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द केला आहे. यावेळी त्यांनी कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाल्याचा आरोप केला. फडणवीस यांच्या आरोपाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या काळात आम्ही उच्चश्रेणीपद कंत्राटी पद्धतीने भरली नव्हती, स्वतःच अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
विद्यार्थ्यांमुळं सरकारला झुकावे लागले
कंत्राटी नोकर भरतीचा जो निर्णय रद्द करण्यात आला आहे, त्याचं खरं श्रेय विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थ्यानी एकत्रित येऊन लढा दिला आहे, त्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेपुढे सरकारला झुकावे लागले, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत
मराठा आरक्षाणसंबंधी नेहमी सकारात्मक बोलतो. आजही काँग्रेसची भूमिका हिच आहे. देशातील जेवढे आरक्षणाचे प्रश्न आहेत, त्यांचा प्रश्न मार्गी लावायाचा असेल तर, ५० टक्क्यांची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिली ती कायद्याने किंवा घटनात्मक बदल करून कायदेशीररित्या नवीन कायदा करून होत नाही तोपर्यंत हा विषय अडचणीचा ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे. समाजातील लोकांच्या भावना तीव्र आहेत, सरकारने आरक्षणा देण्याबाबत कबुल केले होते, त्याची अंमलबजावणी करावी, असे अशोक चव्हाण म्हणाले.