फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी न सापडल्याने सीबीआयकडून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गुन्हा खरा आहे, गोपनीय कागदपत्रे लीक झाली आहेत, मात्र या प्रकरणात आरोपींचा शोध लागत नाही, आरोपी सापडत नाहीत असा सीबीआयचा दावा होता. तो कोर्टाकडून मान्य करण्यात आला आहे.
दरम्यान गोपनीय कागदपत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कशी आणि कधी गेली, हे समजून येत नाही, असेही सीबीआयने कोर्टाला सांगितले आहे. यावरून नाना पटोले आक्रमक होत यावर काही सवाल उपस्थित केले आहेत.
आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात प्रचंड गाजले होते. याच प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
भविष्यात आम्ही फाईल उघड करू
नाना पटोले म्हणाले की, ज्या वेळेस रश्मी शुक्लांवर या प्रकरणी चौकशी सुरू झाली, त्यामध्ये पुणे पोलिसांनी, शुक्लांनी हे फोन टॅपिंग जाणीवपूर्वक केली, या आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण पुण्याच्या कोर्टात चालले. जसे फडणवीसांचे सरकार आले, ते गृहमंत्री झाले, त्याचवेळी शुक्लांना क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाला. मात्र सत्र न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयला देण्यात आले. सीबीआयकडे दिले म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघते का? शुक्लांनी जे काही पाप केलेले आहे, ते लपलेले नाही. आज क्लिनचीट दिली तरी भविष्यात आम्ही फाईल उघड करू.