समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ज्या समृद्धी महामार्गाची ओळख आहे, तोच मार्ग आता मृत्युचा सापळा बनत चालला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे आरोप केले जात आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात असतानाही अपघाताचे सत्र सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रील्स किंवा फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना अनेकजण रस्त्यात वाहन उभे करून रील्स किंवा फोटो काढत असल्याची माहिती आहे.यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या लक्षात आले. याची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेत समृद्धी महामार्गावर रील्स किंवा फोटो काढणाऱ्यांविरोधात कारवाईचा बगडा उगारला आहे. समृद्धी महामार्गावर रील्स आणि फोटो काढताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना ५०० रुपये दंड आणि एक महिन्याचा तरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे, असे संकेत वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहने थांबवून अनेक तरुणी रील्स आणि फोटो काढत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून हुल्लडबाज तरूण रील्स काढत असल्याचे निदर्शनात आले. यानंतर वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाईला सुरुवात केली आहे.
