आषाढीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेले गुलाबी वादळ आता माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात घोंगावत आहे. या तालुक्यातील अनेक गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असे ३५० जण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. तब्बल ४० गाड्यांमधून हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रदर्शन करत मार्गस्थ झाले आहेत.
पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यानंतर भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. वल्याळ यांनी बीआरएस वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत, त्यातूनच सचिन सोनटक्के आणि नागेश वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश सरपंच हे बीआरएस प्रवेशासाठी हैदराबादला रवाना झाले आहेत.दक्षिण सोलापूर तालुक्यावर आजपर्यंत धनगर समाजाचे प्राबल्य राहिले आहे. त्या दृष्टीकोनातून येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरातून आपली उमेदवारी निश्चितीसाठी सोनटक्के हे तालुक्यातील बहुतांश सरपंचांना घेऊन ४० गाड्यांचा ताफा हैदराबादकडे रवाना झाला आहे.दरम्यान, पक्षश्रेष्ठींकडे आमचा उमेदवारीचा आग्रह असणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्न करणार असून येत्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतच्या सर्व निवडणुका बीएसआरच्या माध्यमातून लढवल्या जातील, असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले.
बीआरएसमध्ये आज प्रवेश करणाऱ्यांमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लोकांचाही समावेश आहे .अल्पसंख्यांक जातींना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही सोनटक्के यांनी सांगितले. सोनटक्के पूर्वी भाजपमध्ये होते. पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या प्रवेशावेळीच ते बीआरएसमध्ये गेले होते. अनेक गावचे सरपंच आणि पदाधिकारी सोडून जात असल्यामुळे भाजपला दक्षिण सोलापूरमध्ये फटका बसू शकतो.
यापूर्वी धनगर समाजाचे नेते, माजी दुग्ध विकास मंत्री (स्व.) आनंदराव देवकते यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर बाळासाहेब शेळके यांनी राष्ट्रवादीकडून एकदा प्रयत्न केला. पण, त्यात त्यांना यश आले नाही. मागील तीन निवडणुकीत धनगर समाज भाजपच्या पाठीमागे उभा होता. येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचा उमेदवार राहिल्यास दक्षिण व अक्कलकोट दोन्ही मतदारसंघात भाजपला अडचण होऊ शकते.