भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनामार्फत राबवत असलेल्या देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्निर्माण `अमृत भारत स्टेशन` योजनेअंतर्गत उस्मानाबाद रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी लातूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणीही केली.
उस्मानाबाद मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने उस्मानाबाद रेल्वे स्टेशनच्या संदर्भात असणाऱ्या विविध समस्यांच्या अनुषंगाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नूतनीकरणास २१ कोटी रुपये निधी मंजूर झाला असला तरी उर्वरित सोयी- सुविधा व समस्यांच्या संदर्भात रेल्वे प्रशासन व केंद्रशासनाकडे पाठपुरावा करुन त्या मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार ओमराजे यांनी यावेळी दिली.
लातूर मुंबई रेल्वेस कळंब रोड व ढोकी तसेच पनवेल गाडीस बार्शी येथे थांबा मिळावा, रॅक पॉइंट निर्माण करावे, धाराशिव तुळजापूर रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या नुतनीकरणाचे आणि पुर्नविकासाची पायाभरणी करण्यात आली.
अमृत भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी एकाचवेळी मोदींच्या हस्ते करण्यात आली. महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा या योजनेत समावेश असून उस्मानाबाद येथे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या उपस्थितीत पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी पुनर्विकासासोबत जिल्ह्यातील रेल्वेसंबंधीची इतर मागण्या देखील ओमराजे यांनी मांडल्या.