देशभरात मणिपूर प्रकरणावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मणिपूर प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षांच्या ‘INDIA’ आघाडीने संसदेत मणिपूरच्या मुद्द्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. तर काल (गुरुवारी) विरोधी पक्षांचे खासदार सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेत काळे कपडे घालून सहभागी झाले होते. तर मणिपूरच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाच्याच एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्हात टीका करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ काही दिवसांपुर्वी जगभरात व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. PM मोदी यासंदर्भात अधिवेशन सुरू होण्याआधी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. मात्र, घटनेच्या दोन महिन्यांनंतर मोदी त्यावर काही बोलले नाहीत, संसदेत न बोलता फक्त माध्यमांसमोर त्यांनी भूमिका मांडल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला आहे.
#WATCH | Bihar | After resigning from BJP over Manipur issue, Vinod Sharma says, "With a heavy heart I wrote to JP Nadda and PM Modi that an incident like that in the Manipur video has never happened anywhere else. Still, the PM is sleeping, he doesn't have the courage to sack CM… pic.twitter.com/td5gQYPW5C
— ANI (@ANI) July 27, 2023
या पार्श्वभूमीवर देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच खुद्द भाजपाच्या एका नेत्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला आहे.
बिरेन सिंह यांना हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही- विनोद शर्मा
मणिपूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ‘मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून माझ्या भावना कळवल्या आहेत. भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का?’, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर ‘एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे. मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.