देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत आपल्या महाआघाडीला बेंगळूरूमध्ये झालेल्या बैठकीत ‘इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इनक्लुजिव्ह अलायन्स’ म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव दिले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडकून टीका केली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावाचा उल्लेख करत ‘इंडिया’ नावावर टीका केली. याला आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. ते बुधवारी (२६ जुलै) मुंबईत विधीमंडळाबाहेर बोलत होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया नावावर चर्चा करणं हास्यास्पद आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आम्हाला मोदींचा विचार घालवायचा आहे. आयआयटी, आयआयएम, एम्सच्या नावात इंडिया आहे. ही नावं मोदी बदलणार आहेत का? विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. मणिपूरवर बोलायची पंतप्रधान मोदींची हिंमत नाही.”
“हे अतिशय बालिशपणाचं उत्तर आहे”
“दुसरीकडे मोदी नावाबद्दल, फोटोबद्दल, चित्राबद्दल बोलत आहेत. हे अतिशय बालिशपणाचं उत्तर आहे. आम्ही इंडिया आहोत आणि आम्हाला इंडिया असल्याचा, भारत असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे मोदींनी नावावरून काहीही कुरापत काढली, तरी त्याचा उपयोग होणार नाही,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.