VEDANTA फॉक्सकोन गुजरातला गेला, तिथून रद्द झाला, यात देशाचे नुकसान झाले. यात महाराष्ट्र रोजगार गेला. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. दार खिडक्या उघड्या ठेवल्या असून तिथून सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्र मध्येच राहिले असते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Nashik) दौऱ्यावर असून आज शहरातील सातपूर परिसरात पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या चाळीस आमदारांवर सडकून टीका करत राज्यातील उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले कि, सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड, आपण लढत आहोत. महाविकास आघाडीसरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे भाषण सुरु होण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ते म्हणाले की, खोके सरकार फक्त घोषणांचे सरकार असून घोषणा दिल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. मात्र सद्यस्थितीत साफ आणि स्वच्छ विरुद्ध गद्दारी असे राजकारण सुरू आहे. जगात महाराष्ट्राचे नाव होतं, तो महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला आहे. राजकारणची दलदल झाली असून आता कोण कोणाचे होर्डिंग्ज लावतो, कोण कोणाचे फोटो, लावतो ते समजत नाही. आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? आम्हाला राजकारण फोडाफोडीच जमत नाही, आम्ही जनतेचा आवाज ऐकतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राला तोडण्याचे राजकारण सुरु
महाराष्ट्राला तोडण्याचे राजकारण सुरु असून महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे दोन दिवसांनी लोकेशन दिल्ली असतंय, प्रत्येक आठवड्यात दोन दिवसांनी दिल्लीला जात आहेत. मग गल्लोगलीत कोण फिरणार? तुमच्या शहरात एक नवा उद्योग आला आहे का? नवीन संधी काही आली आहे का? त्यामुळे तिकीट तिकीट बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवं, कारण धोका तुम्हा आम्हाला नाही तर महाराष्ट्राला आहे. राज्यात फोडाफोडीच राजकारण असून राजकीय नेते फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत. यात नुकसान भारताचं झाल, महाराष्ट्राच होत आहे. लाखो तरुण तरुणी ते सगळे रोजगाराच्या संधीसाठी फिरत आहेत, आपल्या राज्यात प्रकल्प नसल्याने तरुणानं नोकरी नाही, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज ऐकणारे कोणी नाही, MAHARASHTRA ला पुढे येऊ द्यायचं नाही, असा घणाघाती टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
आता कुठे गेली तुमची देशभक्ती
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, फोडाफोडीचं राजकारण थांबविण्यासाठी देशप्रेमी पक्ष एकत्र आले. या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरावं लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु असून बोललं तरी गुन्हे दाखल होत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत, मणिपूरचा विडिओ बाहेर आल्याने मुख्यमंत्री बीरेंन सिंह म्हणाले आमच्या राज्याच्या बदनामी झाली, आम्ही आंदोलन करणार आहोत, मात्र या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, असा इशारा देत देशात हिटलरशाही आलीय का? आता कुठे गेली तुमची देशभक्ती, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.