• Sat. Jun 21st, 2025

इर्शाळवाडीवासीयांवर दु:खाचा डोंगर; 200-250 लोकसंख्येचं गाव दरडी खाली

Byjantaadmin

Jul 20, 2023

रायगड | 20 जुलै 2023 : खालापूरमध्ये दरड कोसळ्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर ही दरड कोसळली आहे. इर्शाळ गडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर चार जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे

महिलांचा टाहो... इर्शाळवाडीवासीयांवर दु:खाचा डोंगर; 200-250 लोकसंख्येचं गाव दरडी खाली

नातेवाईकांचा टाहो…

घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबलं गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलंय. हे लोक टाहो फोडत आहेत.या घटनेची माहिती मिळताच बदलापूरहून एक व्यक्ती इर्शाळवाडीत दाखल झाली आहे. त्यांची मुलगी या गावात राहाते. तिच्या काळजी पोटी ते इर्शाळवाडीत पोहोचलेत.आमच्या नातेवाईकांना वाचवा…, अशी विनंती स्थानिक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहेत.

NDRF कडून बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. मात्र इर्शाळगड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. तिथल्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत ते धीर देत आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत.रायगडचे पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. तसंच मंत्री गिरीश महाजनदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. ते या सगळ्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

अंबादास दानवे रवाना

इर्शाळवाडीतील या घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत.तुमचे नातेवाईक जर या दुर्घटनेत अडल्याची भीती असेल तर प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे. तुम्ही या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *