पुणे | 19 जुलै 2023 : राज्यभरात धुवाँधार पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह राज्यभरात पाऊस प्रचंड पडतोय. या पावसाचा रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय पाऊसही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. सध्या मुंबई ते डोंबिवली अशी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. पण डोंबिवलीच्या पुढे डाऊन मार्गाला मोठा खोळंबा झालाय.
विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. मुंबईत सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनाने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उद्या गुरुवारी देखील या मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.