• Sat. Feb 7th, 2026

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सभागृहात आक्रमक; गोंधळ सुरू होताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Byjantaadmin

Jul 17, 2023

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन असल्याने मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जोरदार प्रश्नांची सरबत्ती केली. सभागृहात गोंधळ होताच विधानसभा अध्यक्षांनी दिवसभराचं कामकाज तहकूब केलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांवर अपेक्षित उत्तरं न मिळाल्याने विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं.राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेनाची सुरुवात होताच सत्ताधारी पक्षांकडून संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने आणि अमित झनक यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर राज्यातील आजी-माजी लोकप्रतिनीधींच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विधानसभेचं कामकाज सुरू करण्यात आलं. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मंत्र्यांकडून अपेक्षित उत्तरं न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून काढता पाय घेतला.

विधीमंडळात राष्ट्रवादीत मोठी फूट…

राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील सर्व आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासाठीचा व्हीप जारी केला होता. परंतु अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. तसेच राष्ट्रवादीचे अन्य आमदार विरोधी बाकांवर बसले. त्यामुळं राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आता पक्षातील फूट थेट विधीमंडळात पोहचली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सत्ताधारी बाकांवर तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार विरोधी बाकांवर बसल्याचं सभागृहात पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *