• Wed. Jun 25th, 2025

काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक, 12 नेते दिल्लीत; राज्यात खांदे पालटाची शक्यता

Byjantaadmin

Jul 11, 2023

मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या घडत आहेत. अनेक बदल होत आहेत. नुकतंच राष्ट्रवादीतील एक गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला आहे. अशात काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. राजधानी दिल्ली काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे 12 बडे नेते दिल्लीत गेले आहेत. या बैठकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांवर आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.महाराष्ट्रातील बडे नेते या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर हे नेते बैठकीसाठी दिल्लीत आहेत.

काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक, 12 नेते दिल्लीत; राज्यात खांदे पालटाची शक्यता

कोणत्या मुद्द्याांवर चर्चा?

काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने ही बैठक बोलावली आहे. यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष पद

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सध्या नाना पटोले यांच्याकडे आहे. पण त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. हे पद नाना पटोले यांच्याचकडे कायम ठेवायचं की नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी द्यायची याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे.

विरोधीपक्ष नेतेपदाची चर्चा

अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्र्वादीतील काही नेत्यांसह भाजपसोबत जात सत्तेत सामील झालेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे. विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता काँग्रेसकडे हे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हे पद काँग्रेसकडे आलं तर कोणाला द्यायचं यावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता?

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्याच पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही मोठं बंड होणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा होत आहे. शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमध्ये फूट पडू नये यासाठी काँग्रेसचं दिल्लीतील नेतृत्व प्रयत्नशील आहे. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चेची शक्यता आहे.अजित पवार यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरल्याचं बोललं जात आहेत. अशातच काँग्रेसमध्ये ही अस्वस्थता पसरू नये, यासाठीही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.2024 होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस रणनिती ठरवणार आहे. अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी काय करता येईल, यावरही बैठकीत चर्चेची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *