• Wed. Jun 25th, 2025

राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

Byjantaadmin

Jul 11, 2023

ध्या राज्यातील काही भागात चांगला पावस  पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल आहे. तर पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात मध्यम सरी बरसतील. तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे माना कुरुमजवळ रेल्वे ट्रॅकवरुन पाणी वाहत असल्याने रेल्वे वाहतूक थांबवली आहे. रुळाखालील भराव वाहून गेला आहे. वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईकडे जाणारी अप मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, नागपूर-PUNE एक्सप्रेस भूसावळकडे रवाना झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून रात्रभर रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे प्रयत्न सुर होते. अद्याप नागपूरकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील रुळाच्या दुरूस्तीचे काम सुरूच आहे. माना-कुरूम गावादरम्यान रेल्वे रूळ वाहून गेल्याने मुंबई आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. अनेक गाड्या रद्द झाल्या होत्या. तर काही गाड्यांचे  मार्ग बदलले होते.

विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात दमदार पाऊस

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर विजांचा कडकडाटासह पुन्हा एकदा भंडाऱ्यात दमदार पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होता. जुलै महिना सुरु झाल्यानंतरही पावसानं हजेरी न लावल्यानं शेतीची कामं खोळंबली होती. मात्र, आता झालेल्या दमदार पावसानं शेतकरी सुखावला असून भात पिकाच्या लागवडीला आता वेग आला आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात पाणी टंचाईचे संकट

राज्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाऊस बरसला तरीही राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 29 टक्केच पाणीसाठा आहे. राज्यातल्या सुमारे तीन हजार लहान-मोठ्या धरणांतील पाणीसाठा अजून फक्त 29 टक्क्यांवरच आहे. तर भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या आणि वीजनिर्मितीची भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा अद्याप फक्त 15.86 टक्केच आहे. राज्यात अनेक भागात अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *