मुंबई, 10 जुलै : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. बंडानंतर अजित पवार यानी भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र भाजपनं राष्ट्रवादीसोबत केलेली ही युती भाजपच्या कार्यकर्त्यांना फारशी रूचली नसल्याचं चित्र आहे. असाच एक फोन कॉल सध्या व्हायरल होत आहे. या फोन कॉलचं रेकॉर्डिंग ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दोन फुल, एक हाफ सरकारबाबत 'मन की बात'!
भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. 😊
बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील. #MaharashtraPolitics pic.twitter.com/2saWXZB3oK
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 10, 2023
नेमकं काय म्हटलं दानवे यांनी?
अंबादास दानवे यांनी एक फोन कॉलचं रेकॉर्डिंग ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘दोन फुल, एक हाफ सरकारबाबत ‘मन की बात’! भक्तांनो, कानात गरम तेल घातल्यासारखे होईल.. पण ऐकाच.. बाजारात बरनॉल संपले असेल तर तेथील शिवसैनिकांना सांगा.. मिळवून देतील’. असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं आहे.
फोन रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय?
सध्या एक फोन कॉलची रेकॉर्डिंग व्हायरलं होत आहे. या रेकॉर्डिगनुसार हा फोन पक्षाकडून कार्यकर्त्याला आल्याचं दिसून येत आहे. समोरून कार्यकर्त्याला ओळखपत्रासाठी त्याचा ब्लड ग्रुपबाबत विचारला जातो. मात्र संतप्त कार्यकर्ता आपला ब्लड ग्रुप देण्यास नकार देतो, तसेच भाजप आणि राष्ट्रवादी युतीवर नाराजी व्यक्त करतो.