पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता टोमॅटोच्या किंमतीवरून ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठांमध्ये टोमॅटोला १०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळं स्वयंपाकघरात टोमॅटो जवळपास गायब झाला आहे. टोमॅटोच्या दरवाढीचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. परंतु आता टोमॅटोचा भाव ठरवण्यावरून पुण्यातील चंदननगर परिसरात ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगांवशेरीच्या मार्केटमध्ये टोमॅटोच्या किंमतीवरून मोठा राडा झाला आहे.
अनिल गायकवाड असं टोमॅटो विक्रेत्याचं नाव असून गोापल ढेपे असं ग्राहकाचं नाव आहे. गोपाल हे वडगावशेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाजीविक्रेते अनिल गायकवाड यांनी त्यांना २० रुपयांना पावशेर असा भाव सांगितला. त्यावेळी गोपाल यांनी टोमॅटो खूपच महाग असल्याचं म्हटलं. त्यावरूनच अनिल आणि गोपाल यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रकरण वाढल्यानंतर गोपाल आणि अनिल यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केलं. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी तातडीने मध्यस्थी करत वाद मिटवला.वडगावशेरीच्या भाजी मार्केटमध्ये हाणामारी झाल्यानंतर गोपाल ढेपे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता गोपाल यांच्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी भाजी विक्रेते अनिल गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीत गोपाल यांना जबर मार लागला आहे. त्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.