आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. सभेला झालेल्या गर्दीचे उदाहरण देत “ही गर्दी पाहून आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील, जर उघडले नसतील तर त्यांनी (निवडणूक आयोगाने) त्यांचे डोळे तसेच ठेवावेत. कारण आता यांचे (मतदारांचे) डोळे उघडले आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारणाची पातळी सध्या खाली चाललेली आहे. या महाराष्ट्राची ओळख जगात गद्दाराचा महाराष्ट्र होत चालली आहे. मात्र, ही ओळख पुसण्याच काम आपण करणार आहोत. आपले कितीही आमदार, खासदार गेले तरी चालतील, पण शिवसैनिक आजही माझ्याबरोबर आहेत. BJP हा बाजारबुणग्यांचा पक्ष झाला आहे. पक्ष संपवून टाकायची ही भाजपची वृत्ती संपवून टाकायची आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर (शिंदे गट) जोरदार टीका केली.
“राजकारणात फोडाफोडी चालत असते. पण पक्ष पळवून नेण्याची वृत्ती खोडून काढावी लागणार आहे. मला खुर्चीचा मोह कधीच नव्हता. पण भाजपने शब्द पाळला नाही. भाजपला ठाकरे नको SHIVSENA हवी आहे. दुसऱ्यांची घरं फोडण्याची विकृती फक्त भाजपमध्येच आहे”, असा हल्लबोल करत राज्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी मोठी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
संजय राठोडांवर साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांनी SANJAY RATHOD यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “यांच्यामुळे (शिंदे गटामुळे) गद्दारांचा आणि लाचारांचा महाराष्ट्र होतोय. दोनशे रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री का केलं? मात्र, तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हतं. आपला अजून भाजप पक्ष झालेला नाही. भाजप हा पक्ष आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. भाजपमध्ये आता निष्ठावंताची काय हालत झाली आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे नी भाजपसह संजय राठोड यांच्यावर केली.